Skip to main content

प्रासंगिक - आपण कुठवर पोचलो ?

आपण कुठवर पोचलो ?

       पृथ्वीवर आपण किती छोटे आहोत यापेक्षा या ब्रह्मांडात आपण इवलेसे जीव सुद्धा नाहीत हे सत्य आहे. इतर प्राण्यांप्रमाणेच माणूस, फक्त त्याला बुद्धि जास्त. 

       त्याने हे सगळं तयार केलं या बुद्धीच्या जोरावर. बुद्धी सोडून सगळ्या माणसांमध्ये, प्राण्यांमध्ये काही फरक नाही. खाणे, पिणे, पचवणे, संभोग, मुलांना जन्म देणे, म्हातारे होणे आणि मरून जाणे. प्रत्येक प्राण्याला या सर्व गोष्टी आणि सोबत भावनाही असतात. आपले जोडीदार सुद्धा ! तसे माणसांनाही आहेत. फरक इतकाच, त्याने या नात्यांना नावं दिली, आणि कोणत्या नात्यातल्या व्यक्तीने आपल्यासाठी काय केलं पाहिजे हे मापदंड ठरत गेले. त्यानुसार कोणतं वागणं नैतिक आणि कोणतं अनैतिक याच्या व्याख्या बनत गेल्या आणि हे नात्याचं प्रकरण अधिक गुंतागुंतीचं बनत गेलं. 


        पक्षी, प्राण्यांची आई पिलाला जन्म देते. त्याच्या पंखात, पायात बळ येईपर्यंत, त्याला स्वतःची अन्नाची गरज भागवता येईल, इथपर्यंत ते आपल्या जीवनाचा कितीतरी भाग खर्च करत असावेत. नंतर ते त्याला सोडून दिल्यात जमा करतात. त्यांना आपण खर्च केलेल्या कष्टाची परतफेड त्यांच्याकडून हवी नसते की उपकार केल्याचं श्रेय ! ते त्यांचा जोडीदार शोधतात आणि आपल्या जन्मदात्यांनी जे केलं तेच करतात. म्हातारपणी मरूनही जातात. त्यात जन्म दिलेल्या जीवाचा अपराधीपणा नसतो, की जन्मदात्याना त्यांचा द्वेष !





         माणसांमध्येही असंच असावं काही हजारो वर्षांपूर्वी. आता त्याने भावना आणि नात्याचं क्लिष्ट जग निर्माण केलंय. त्यातून एकमेकांबद्दलच्या अपेक्षा आणि एकमेकांवरील हक्क तो गाजवू लागला. हे सगळे पाश तोडले की वरवर कळत जातं, प्रत्येक माणूस स्वतंत्र आहे. जन्मदात्याकडून त्याचा जन्म, पालनपोषण आणि पोट भरण्याचं प्रशिक्षण मिळवणं हा त्याचा नैसर्गिक, प्राकृतिक हक्क आहे. नंतरच्या काळात तो पृथ्वीवरचा स्वतंत्र जीव आहे, त्यावर कुणाचा हक्क नाही. त्याला त्याच्या सर्व शारीरिक क्रिया परिस्थितीनुसार पार पाडण्याचे, जोडीदार शोधून त्याच्याशी भावनिक, शारीरिक संबंध ठेवण्याचे अधिकार निसर्गाने त्याला बहाल केलेत. त्यात तो कमजोर राहिला तर स्वतःहून मरून जाण्याचा नियमही निसर्गाचा. निमित्त म्हणून त्याच्या अन्नसाखळीतील त्याच्या भक्षकाचं ते अन्न. त्याचा भक्षक क्रूर नाही, त्याचं सुद्धा स्वतःच्या पोटासाठी केलेलं ते काम नैतिकच. यावरून स्पष्ट होतं, पोट भरलेलं असताना माणसाने आपण तयार केलेल्या मोह मायेसाठी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा खून करणे नैतिक नाही. त्याला जे हक्क निसर्गाने बहाल केलेत तेवढ्याच हक्कांचा तो वाली. 


       परंतु आपण मानवाने एकीकडे या हक्कांच्या मर्यादा पोट भरण्यापलीकडे नेऊन मोडीत काढल्या आणि दुसरीकडे स्वतंत्र जीव म्हणून जगण्याच्या अनेक मानवप्राण्यांच्या अधिकाराला आपल्या नियमांचे टाळे बसवले. त्याच्या शारीरिक क्रियांवर बंधनं आली, त्याचं जीवन खाजगी आणि सामाजिक अशा दोन भागात विभागलं गेलं. 



        नर आणि मादी मानवाचं संपूर्ण आयुष्य सुद्धा स्वतंत्र नसावं का ? की माणूस सर्व सजीवांसाठी असलेला 'Survival of fittest' हा सिद्धांत माणूस फक्त आपल्याच मानव जमातीसाठी लागू करून घेऊ लागलाय ? जसं की जो माणूस माणसांच्या मापदंडात बलाढ्य, बलवान, तो स्वतंत्र जगण्यास जास्त समर्थ ? आपण गुंतलोय या क्लिष्टतेत, आपणच सोयीसाठी तयार केलेल्या नात्यांमध्ये, त्यांच्या गाजवल्या जाणाऱ्या हक्कामध्ये, त्यांच्या अपेक्षांमध्ये ! 


   आपण स्वतंत्र होऊ शकतो ?
    
- तुषार पोपटराव वाघमारे
(7020346820)

Comments

Popular posts from this blog

समीक्षा - साहित्य आणि साहित्य संशोधनाची सृजनशील वाट

'साहित्यसंशोधन - वाटा आणि वळणे'         पुस्तकाचे लेखक - डॉ. सुधाकर शेलार समीक्षावजा लेख - तुषार वाघमारे          सध्या भारतीय शिक्षण व्यवस्थेबाबत सामान्यांपासून ते तज्ज्ञांपर्यंत प्रत्येकातून नाराजीचाच सूर ऐकायला येतो. मग ते मूल्यशिक्षणाची तक्रार असेल किंवा मग जागतिक पातळीवर खरा उतरायला तितकासा सक्षम नसणारा भारतीय उच्चशिक्षित व्यक्ती ! 'भारताच्या IIT सारख्या संस्थेत शिकलेले विद्यार्थी पुढे अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशांमध्ये जाऊन जगाचं नेतृत्व करण्याचं सामर्थ्य ठेवतात', असं आपण अभिमानाने मिरवत असतो, मात्र त्याच क्षणी PhD मिळवलेला विद्यार्थी भारतात 'सुशिक्षित बेरोजगार' म्हणून का फिरतो ? या प्रश्नाचं उत्तर अजूनही भारतीय शिक्षण व्यवस्थेला म्हणा किंवा इथल्या राजकीय नेतृत्वांना देता आलेलं नाहीय. यामध्येच मुद्दा येतो दर्जेदार शिक्षणाचा. शिक्षणाचा दर्जा हा सुद्धा प्रस्तुत प्रश्नाला बराचसा कारणीभूत ठरणारा मुद्दा आहे.           हे  सर्व चित्र पाहता डॉ. सुधाकर शेलार यांनी लिहिलेलं 'साहित्य संशोधन - व...

गाव माझा भाग - ३ लालटेन आणि चिमणी

        लालटेन आणि चिमणी             बऱ्याच दिवसांतून गावाकडच्या विसर पडलेल्या पण अजूनही आठवण काढली कि शेकडो गोष्टींची आठवण करून देणाऱ्या काही गोष्टींच्या या मालिकेत आज बऱ्याच दिवसांतून भेटत आहोत. तत्पूर्वी थेट चिंचदर्यात (देवदैठण गावाजवळची ब्राह्मणांच्या अवघ्या तीन चार घरांची वाडी) नेणाऱ्या, पानतासाने गुरं चारताना शुद्ध ब्राम्हणी भाषेत केलेली शिवार भेट आपण अजिंक्यच्या लेखांमधून अनुभवलीच !!       आमच्या वाघमारे वस्ती (देवदैठण आणि हिंगणीच्या शिवेवर वसलेली) वरती यायचं म्हटलं की प्रधानमंत्री योजनेतून झालेली डांबरी सडक तुम्हाला थेट वर्ग एक च्या वातानुकूलित डब्यात बसून गेल्याची अनुभूती देते. होय, नेमकं शहराचं वर्णन करताना गावाकडच्या उपमा द्याव्या लागतात तसं गावाची चुनुकही न अनुभवलेल्या उगवत्या पिढीला आधुनिक शहरी उपमा देनंही भागच. असो हा अनुभव मिळतो तो रस्त्याच्या दोन्ही अंगाला ऊस किंवा हिरव्यागार घासाच्या बागायत रानामुळे गुलाबी हवा म्हणता म्हणता चांगलीच कडकी भरंल अशी थंडी अनुभवायला देतो. वस्तीवरची मायेची ऊब अनुभ...

भयकथा १ - अमावस्येची रात्र आणि पांढऱ्या साडीतली बाई...

अमावस्येची रात्र आणि पांढऱ्या साडीतली बाई सत्य घटनेवर आधारित.. सायकलच्या पॅडलची करकर, मध्येच अंधारात न दिसलेल्या खड्ड्यात सायकल जाऊन वाजणारी घंटी आणि दोघांचीही चूप !  ना रस्त्याकडेला एखादं घर, ना शेतातली दिवाबत्ती, फक्त अंधार आणि अंधारच. अधुनमधुन एखादा माणूस गेल्यावर नातेवाईक जसा आक्रोश करतात तसा अक्राळविक्राळ आवाज काढणारे कोल्हे अंगावर शिरशिरी उठवत होते.           शिंदे (म्हणजे मी स्वतः), बंट्या तांबे (पोंचू) आणि माऊल्या दंडवते (कावळा). तिघांची गट्टी लंय झ्याक. गावात शाळेसमोरच आमचं जुनं घर उभ्या फळ्यांचं बनवलेलं. वर्गातून रस्त्यालगतची ती रूम खिडकीतून दिसेल अशी. इयत्ता १० वी चं वर्ष होतं, त्यामुळे STD मधून TD ने सायकल दामटत लवकर घरी जायचं, दिवस मावळायच्या आत घरचं असेल ते काम उरकून रूमवर हजर व्हायचं. हे नेमानं ठरलेलं. निमित्त अभ्यास असलं तरी, पोरं सोरं एकत्र आल्यावर खंडीभर उद्योग सुचतात.    असो त्या दिवशी नेहमीप्रमाणे शाळेत दुपारच्या सुट्टीत बेंच वर बुक्क्यांनी वाजवत चांगला ताल धरला होता. पोरींची रांग शेजारीच असल्याने सोज्वळ...