Skip to main content

भयकथा १ - अमावस्येची रात्र आणि पांढऱ्या साडीतली बाई...


अमावस्येची रात्र आणि पांढऱ्या साडीतली बाई



सत्य घटनेवर आधारित..


सायकलच्या पॅडलची करकर, मध्येच अंधारात न दिसलेल्या खड्ड्यात सायकल जाऊन वाजणारी घंटी आणि दोघांचीही चूप !  ना रस्त्याकडेला एखादं घर, ना शेतातली दिवाबत्ती, फक्त अंधार आणि अंधारच. अधुनमधुन एखादा माणूस गेल्यावर नातेवाईक जसा आक्रोश करतात तसा अक्राळविक्राळ आवाज काढणारे कोल्हे अंगावर शिरशिरी उठवत होते.



         शिंदे (म्हणजे मी स्वतः), बंट्या तांबे (पोंचू) आणि माऊल्या दंडवते (कावळा). तिघांची गट्टी लंय झ्याक. गावात शाळेसमोरच आमचं जुनं घर उभ्या फळ्यांचं बनवलेलं. वर्गातून रस्त्यालगतची ती रूम खिडकीतून दिसेल अशी. इयत्ता १० वी चं वर्ष होतं, त्यामुळे STD मधून TD ने सायकल दामटत लवकर घरी जायचं, दिवस मावळायच्या आत घरचं असेल ते काम उरकून रूमवर हजर व्हायचं. हे नेमानं ठरलेलं. निमित्त अभ्यास असलं तरी, पोरं सोरं एकत्र आल्यावर खंडीभर उद्योग सुचतात.

   असो त्या दिवशी नेहमीप्रमाणे शाळेत दुपारच्या सुट्टीत बेंच वर बुक्क्यांनी वाजवत चांगला ताल धरला होता. पोरींची रांग शेजारीच असल्याने सोज्वळतेचा आव आणत पावडर, रुसो आणि चार दोन मुलींनी नाकं मुरडली. ताल बिघडला तशा गप्पा सुरु झाल्या, बोलता बोलता संध्याकाळी लवकर रूमवर यायचं हे पक्कं झालं.


   
    संध्याकाळी मी आणि कावळा वेळेवर रूम वर पोहचलो. पोंचूचा काय पत्त्या नाही. अचानक चुलत्यानं घरी इन्ट्री मारल्यामुळं सिद्धा नदीपलीकडंच्या पोंचूला नदी सुद्धा ओलांडता आली नव्हती. शेवटी ,थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पांचे एक दोन सिजन झाल्यावर शांत बसलो. अजून हातात मोबाईल नव्हते. तेवढ्यात पांडा (हे पण टोपण नाव) ची आठवण आली. सांच्याला साधारण ४ किमी असलेला रस्ता, दैठणची घाटाडी चढुन पांडाकडं जायचा बेत ठरला. तसा मी घाबरटचं होतो पण STD मधल्या TD सोबत रात्री गावच्या गल्लीबोळांमधून बोंबलत हिंडण्याच्या सवयीमुळे धट झालो होतो. नियोजन ठरलं तस दोघेही कावळ्याच्या सायकलवरून डबलसीट साधारण 7 च्या सुमारास निघालो. जाताना वाटेनं वर्दळ, ओढ्याच्या कडेला गावाबाहेर मोठ्ठं वडाचं झाड, पलीकडे स्मशानभूमी. जरा निवांतच गेलो. ८ च्या सुमारास पांडा च्या घरी पोहोचलो तर पांडा आम्हाला पाहून भलताच खुष होऊन त्याच्या रोजच्या पद्धतीने भेटला. नंतर असंच गप्पा मारता मारता पांडाच्या घरीच जेवण उरकलं. जेवणानंतर गप्पा मारत बसण्याची आमची जुनी परंपरा आहे, या गप्पांना वेळेचं भान मात्र नसतं. एकदा अंधार पडला म्हणजे घड्याळात डोकावतंय कोण ? आणि घरी जायची घाईही नाही, रूमवर असल्यानं विचारणारं कोण नाही. नाही हो म्हणता म्हणता विषय निघाला भुतं असतात की नाही ! गप्पांच्या मैफलीत दोन तीन अंगाला शहारे आणतील आशा भुताटकीच्या जुन्या गोष्टी झाल्या.

     लक्ष गेलं घड्याळाकडे, पाहिलं तर १०:४५ ! आता मूलखाची जाग आली. कावळा ताडकन उठला आणि बोलला शिंद्या चल लै उशीर झालाय. वाटेची वाहनं ९ नंतरच बंद होतात. त्यात रात्रही  तशीच होती काळी कुट्ट, थोड्या वेळापूर्वी झालेल्या भुताटकीच्या गोष्टींसारखी. सोबत कसलाच प्रकाश नाही. एकदा निघलं की तोंड घेऊन निघायचं ही आमची खासीयतच होती. शेवटी नाय व्हय नाय व्हय करता करता दोघेही मोठ्या हिमतीने बाहेर पडलो.



      सायकल काढली, आणि रोडला लागणार इतक्यात पलीकडून धप्प आवाज होऊन क्षणात काळजाचा ठोका चुकवील असं काहीतरी आडवं पळत गेलं. दोघेही क्षणात स्तब्ध,पण ती मांजर असल्याचं कळताच पुढचा रस्ता पकडला. थोड्या वेळापूर्वी झालेल्या कथांमध्ये हडळ, उघडा माणूस, वगैरे वगैरे डोक्यात फिरत होतं. मध्येच लांबून वाड्यावस्त्यांवरून मध्यरात्रीच्या भुंकणाऱ्या कुत्र्यांच्या आवाजानं अंगावर शहारे उभे राहात होते. या सगळ्याकडे दुर्लक्ष करत सायकलीला टांग मारली, मी सायकल पुढे ढकलत होतो, मध्यरात्रीच्या या भयाण शांततेत एखाद्या खड्ड्यात पडून बेशुद्ध पडलो तरी कुणाला सकाळपर्यंत तपास लागणार नव्हता. सायकलच्या पॅडलची करकर, मध्येच अंधारात न दिसलेल्या खड्ड्यात सायकल जाऊन वाजणारी घंटी आणि दोघांचीही चूप !  ना रस्त्याकडेला एखादं घर, ना शेतातली दिवाबत्ती, फक्त अंधार आणि अंधारच. अधुनमधुन एखादा माणूस गेल्यावर नातेवाईक जसा आक्रोश करतात तसा अक्राळविक्राळ आवाज काढणारे कोल्हे अंगावर शिरशिरी उठवत होते. भीती वाढतच चालली होती, आता मात्र बामनाचं गाणं गुणगुननं सुरू झालं. २० मिनिटे झाली, अशा गंडलेल्या अवस्थेत पॅडलला जोर लावायला विशेष थकवा जाणवत नाही, भीतीच घाम काढायला पुरेशी असते. कसाबसा भुताखेतांच्या गोष्टींचा मळा, गाड्यांच्या अपघाताचा बादशहा म्हणजेच घाटाडी चा उतार चालू झाला. घाटाडीत उजव्या हाताला म्हसनवाटा (स्मशानभूमी) आहे. जसजशी सायकल तिथपर्यंत जात होती, मधेच दोघांची खुसूदफुसूड होऊन बंद होत होती.



     काहीच दिसत नसेल तरी नजर खाली चकाकडे, उजव्या - डाव्या बाजूला पाहायची हिम्मतच नाही. पण शेवटी बालमनच ! स्मशानभूमीपर्यंत गेलो आणि तिकडे नजर फिरवल्याशिवाय मन राहिना, सायकल आता हळूहळू वेग घेत होती, खड्ड्यात आदळत होती, पॅडलचा आवाज, घंटीचा आवाज, अचानक कोल्हा किंचाळल्याचा आवाज आला आणि सर्र्ररकन हातापासून निघालेले शहारे थेट डोक्यापर्यंत गेले, मेंदूवरचं कातडं गोळा होऊन थिजल्यासारखं झालं, केस उभे राहिलेत की काय, आणि अचानक डोळ्यात पाणी देखील ! डोळे अंधारातही अंधुक झाले. पलीकडे नजर गेली, तोंडातून शब्द फुटेना, "माऊल्या, प...प्...लीकड.. ब्...ब..." माऊल्याही गप्प ! भयाण शांतता, माऊल्या पडला की काय ? मी पलीकडं पांढऱ्या साडीत असलेल्या बाईची आकृती पाहिली होती.. सेकंदाच्या करोडो भागात एकेक विचार असा सपासप पळू लागला, माऊल्या मागच्या मागचं ओढून नेला तर ?, आता आपण घरी पोचणार नाही... काही क्षणात हे घडतानाच भरीस भर अजून एक... उताराने सायकल वेग घेत होती पॅडल चा वेगही वाढत होता तेवढ्यात एक आवाज झाला खट्ट् !!! काय झालं ? आता नकटीच्या लग्नाला सतराशेसाठ विघ्नं.. सायकलची चैन पडली होती. तीच पांढरी आकृती माऊल्यानेही पाहिली होती, आणि म्हणून क्षणभर 'तेरी भी चूप, मेरी भी चूप'. एक टिटवी आमची जिरवायची म्हणून ट्रीट ट्रीट करत भर्रकन गेली, आणि आता खरंच जिरली. चैन पडली तरीही "गप पायंडेल हान" एवढं एकच वाक्य कावळ्याच्या तोंडातून बाहेर पडलं, आणि तो मागे असल्याची खात्री झाली.



        हे इथेच संपणार नव्हतं, तो एक क्षण जातो न् जातो, माझ्या लक्षात आलं चैन तर पडली आहे तरी पण सायकल चा पॅडल चालूच आहे ! आता मात्र पांढऱ्या साडीतली बाई हडळंच आहे आणि आपल्याला हडळ लागलीय हा विचार अख्ख्या शरीरावरची लव काट्यासारखी उभी करत काळजाला कापत क्षणार्धात सरकला. भीती ही वाढू लागली होती. मात्र सायकल वेगात असल्यानं थोडी पुढं जाताच त्या शहारलेल्या अंगाने बदललेल्या भलत्याच कापऱ्या आवाजात मोठ्याने गाणं म्हणायला सुरुवात झाली. जिकडं तिकडं काळोखच ! पुन्हा एकदा टिटविनं कान जोरात फुंकले आणि आम्ही आवाज वाढवला..
'ये दोस्ती हम नही तोडेंगे, तोडेंगे दम मगर
पर साथना छोडेंगे'


        चैन पडलेल्या सायकलने आता प्रचंड वेग घेतला होता, रक्त गोठलेलं, मेंदू गोळा झाल्यागत, अंग शहारलेलं, गाण्याने अजूनही शहारत होतं. ब्रेक दाबनं महागात पडणार होतं. नाही दाबला तर पुढे वळण आणि खड्ड्यात पडून काटवनात पडण्याची भीती. त्या पांढऱ्या बाईची आकृती काही केल्या मनातून जाईना, अंग कापत होतं, वळण गेलं, ब्रेक दाबायची गरज पडली नाही. आता कुत्री भुंकू लागली, मात्र आत्ता क्षणभरापूर्वी पाहिलेल्या नरकअनुभवापुढे त्यांचं भुंकणं आमचं अस्तित्व जागं करून देणारं होतं. समोर बनकर मळ्यातल्या घरांच्या लाईट दिसल्या आणि आणि आपण जीवंत आहोत याची खात्री झाली. ती रात्र अमावस्येची होती ! घाबरल्याची धडधड अजूनही सुरूच होती, तशीच सायकल प्रतीक बनकर च्या घरी घातली तेव्हा रात्रीचे ११:१५ वाजले असतील. एवढ्या मध्यरात्री अर्ध्या तासापूर्वी चाललेल्या भुताटकीच्या गप्पा याची देही अनुभवल्याने शरीर गळून गेल्यासारखं झालं होतं. प्रतिकच्या घरच्यांना या वेळी जागं करून घाईत पहिलं पाणीच मागितलं. मात्र मावशींना आमचा कारणामा सांगितल्यावर शिव्या देखील खाव्या लागल्या. थोडं शांत झाल्यावर रूमकडे निघालो, परत दैठणच्या ओढ्यापलीकडे स्मशानभूमी. आता मात्र सायकलचं पुढचं चाक आणि मी, अजिबात वरती पाहणे नाही !


        सगळं उरकून रूम वर येऊन शां...त पडलो. आल्यावर त्या पाहिलेल्या गोष्टीवर बराच वेळ तर्क वितर्कि चर्चा झाली. आणि बोलता बोलता कधी झोप लागली हे समजलं नाही. सकाळी उठून मारुतीरायाचं दर्शन घेऊन दिवसाला सुरुवात केली.
आजही मित्रांमध्ये हा विषय सांगताना अंगावर सरर्कन काटा उभा राहतो.. मनाचे जरी असले तरी हे खेळ माणसाला पुरते गंडवून धुऊन काढतात हे मात्र खरं !

अनुभवाचे धनी - धनंजय शिंदे, अजिंक्य दंडवते, देवदैठण

शब्दांकन - तुषार वाघमारे, देवदैठण

Comments

  1. एक नंबर भावा 😎

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 😊

      Delete
  2. तुझी लेखणी अप्रतिम आहे. कल्पनाच करवत नाहीये 😍

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 😊 तुमच्या या प्रतिक्रिया मला भरभरून प्रेरणा देतात लिहिण्यासाठी

      Delete
  3. You are gifted Tushar... really mesmerizing writing... keep it up..

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you so much sir 😊 You are always my inspiring one

      Delete
  4. Tushar keep it up 👌👌

    ReplyDelete
  5. Kdhi kahi sangitl nahi tu yababat
    अप्रतिम लेखन 👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. माझ्या बाबतीत नाही घडलेलं हे, धनंजय आणि माऊली सोबत घडलेलं. मी लिहिलंय फक्त.
      मनःपूर्वक धन्यवाद 😊

      Delete
  6. Chan lihilay vachtana goshti imagine hotat mast....

    ReplyDelete
  7. Kharach khup mast aahe ... vachatana goshti dolyanpudhe distat.... Nice

    ReplyDelete
  8. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  9. Unbelievable story tushar

    ReplyDelete
  10. अप्रतिम लिहिलंय तुषार सर तुम्ही ...👌👍

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद ! 😊

      भेट देत राहा, नवीन लेखन वाचण्यासाठी

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

समीक्षा - साहित्य आणि साहित्य संशोधनाची सृजनशील वाट

'साहित्यसंशोधन - वाटा आणि वळणे'         पुस्तकाचे लेखक - डॉ. सुधाकर शेलार समीक्षावजा लेख - तुषार वाघमारे          सध्या भारतीय शिक्षण व्यवस्थेबाबत सामान्यांपासून ते तज्ज्ञांपर्यंत प्रत्येकातून नाराजीचाच सूर ऐकायला येतो. मग ते मूल्यशिक्षणाची तक्रार असेल किंवा मग जागतिक पातळीवर खरा उतरायला तितकासा सक्षम नसणारा भारतीय उच्चशिक्षित व्यक्ती ! 'भारताच्या IIT सारख्या संस्थेत शिकलेले विद्यार्थी पुढे अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशांमध्ये जाऊन जगाचं नेतृत्व करण्याचं सामर्थ्य ठेवतात', असं आपण अभिमानाने मिरवत असतो, मात्र त्याच क्षणी PhD मिळवलेला विद्यार्थी भारतात 'सुशिक्षित बेरोजगार' म्हणून का फिरतो ? या प्रश्नाचं उत्तर अजूनही भारतीय शिक्षण व्यवस्थेला म्हणा किंवा इथल्या राजकीय नेतृत्वांना देता आलेलं नाहीय. यामध्येच मुद्दा येतो दर्जेदार शिक्षणाचा. शिक्षणाचा दर्जा हा सुद्धा प्रस्तुत प्रश्नाला बराचसा कारणीभूत ठरणारा मुद्दा आहे.           हे  सर्व चित्र पाहता डॉ. सुधाकर शेलार यांनी लिहिलेलं 'साहित्य संशोधन - व...

गाव माझा भाग - ३ लालटेन आणि चिमणी

        लालटेन आणि चिमणी             बऱ्याच दिवसांतून गावाकडच्या विसर पडलेल्या पण अजूनही आठवण काढली कि शेकडो गोष्टींची आठवण करून देणाऱ्या काही गोष्टींच्या या मालिकेत आज बऱ्याच दिवसांतून भेटत आहोत. तत्पूर्वी थेट चिंचदर्यात (देवदैठण गावाजवळची ब्राह्मणांच्या अवघ्या तीन चार घरांची वाडी) नेणाऱ्या, पानतासाने गुरं चारताना शुद्ध ब्राम्हणी भाषेत केलेली शिवार भेट आपण अजिंक्यच्या लेखांमधून अनुभवलीच !!       आमच्या वाघमारे वस्ती (देवदैठण आणि हिंगणीच्या शिवेवर वसलेली) वरती यायचं म्हटलं की प्रधानमंत्री योजनेतून झालेली डांबरी सडक तुम्हाला थेट वर्ग एक च्या वातानुकूलित डब्यात बसून गेल्याची अनुभूती देते. होय, नेमकं शहराचं वर्णन करताना गावाकडच्या उपमा द्याव्या लागतात तसं गावाची चुनुकही न अनुभवलेल्या उगवत्या पिढीला आधुनिक शहरी उपमा देनंही भागच. असो हा अनुभव मिळतो तो रस्त्याच्या दोन्ही अंगाला ऊस किंवा हिरव्यागार घासाच्या बागायत रानामुळे गुलाबी हवा म्हणता म्हणता चांगलीच कडकी भरंल अशी थंडी अनुभवायला देतो. वस्तीवरची मायेची ऊब अनुभ...